spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बदली आदेशाला केराची टोपली!

– पांढरकवडा पोलिस ठाण्यात आदेशानंतरही काही कर्मचारी ‘मूळ ठाण्यातच’; वरिष्ठांच्या आदेशाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

पांढरकवडा :- यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होऊनही पांढरकवडा पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांची बदली प्रत्यक्षात झाली नसल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ‘बदली आदेश कागदावरच, प्रत्यक्षात मात्र जैसे थे’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होत असून, पोलिस प्रशासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी २३ मे २०२६ रोजी जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने नव्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आल्याचे वृत्त आहे. नियमानुसार बदली आदेशानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना ठरावीक कालावधीत कार्यमुक्त करून नवीन ठिकाणी रुजू करण्याची प्रक्रिया अपेक्षित असते. मात्र, पांढरकवडा पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बदली आदेशाची पूर्ण अंमलबजावणी झाली नसल्याची चर्चा आहे. काही कर्मचारी दीर्घकाळापासून याच ठिकाणी कार्यरत असून, बदली आदेशानंतरही त्यांना येथेच ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एका ठिकाणी दीर्घकाळ सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मुदतवाढ किंवा स्थानिक पातळीवरच कार्यरत ठेवण्यामागे नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

आदेश कोणाचा आणि अंमलबजावणी कोणाची?

बदलीचे आदेश वरिष्ठ पातळीवरून जारी झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असते. मात्र आदेशाची अंमलबजावणीच होत नसेल तर ‘वरिष्ठांचा आदेश महत्त्वाचा की स्थानिक पातळीवरील निर्णय?’ असा प्रश्न निर्माण होतो.

दरम्यान, बदली आदेशानंतरही संबंधित कर्मचारी जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्यास त्यांना कोणत्या अधिकाराने थांबविण्यात आले, याबाबतही प्रशासनाकडून स्पष्टता अपेक्षित आहे. तसेच आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण, याची चौकशी होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्रशासन काय भूमिका घेणार?

पांढरकवडा पोलिस ठाण्यातील बदली आदेशाची अंमलबजावणी, संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यमुक्ती आणि नवीन नियुक्तीच्या ठिकाणी त्यांची रुजू प्रक्रिया याबाबत यवतमाळ जिल्हा पोलिस प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

बदली आदेशानंतरही कर्मचारी मूळ ठिकाणीच कार्यरत असल्याचे अधिकृत कागदपत्रांतून स्पष्ट झाल्यास, आदेशाच्या अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या किंवा आदेशाला बगल देणाऱ्या संबंधितांवर कारवाई होणार का? हा आता मुख्य प्रश्न ठरला आहे.

‘बदली आदेशाला केराची टोपली’ या चर्चेमुळे पांढरकवडा पोलिस ठाण्यातील परिस्थितीकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.