· प्रभावी अंमलबजावणीसाठी संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश
मुंबई :- बाल भिक्षेकरी समस्येचे समूळ उच्चाटन करून या बालकांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येत असलेली फिरते पथक योजना जलदगतीने कार्यान्वित करावी. यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या, रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजना कायमस्वरूपी सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्यातील २८ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये प्रत्येकी एक पथक, तसेच बृहन्मुंबई शहर, मुंबई उपनगर पूर्व आणि मुंबई उपनगर पश्चिम यासाठी प्रत्येकी एक पथक, अशी एकूण ३१ फिरती पथके कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या पथकांच्या निवड प्रक्रियेसह आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून योजना प्रत्यक्ष कार्यान्वित करावी, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
रस्त्यावर राहणाऱ्या बालकांचा शोध घेणे, त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजना करणे, यासाठी ही पथके महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. बालकांच्या हिताशी संबंधित असलेल्या या योजनेची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता आणि जबाबदारीने काम करावे. प्रत्येक बालकाला सुरक्षितता, संरक्षण आणि पुनर्वसनाची संधी मिळेल, यासाठी यंत्रणेने प्रभावीपणे काम करावे, असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.





