– ‘वेग नको, जीव हवा!’ : मुलांच्या हट्टापेक्षा सुरक्षेला द्या प्राधान्य; अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यास पालकांवरही होणार कडक कायदेशीर कारवाई!
पंकज परशुरामकर,नवेगाव बांध :- अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी अथवा चारचाकी वाहने सोपवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, मुलांच्या हट्टापोटी पालकांकडून घेतला जाणारा हा बेजबाबदार निर्णय कधी जीवघेणा ठरेल याचा काहीच नेम राहिलेला नाही. वाहन चालवण्यासाठी आवश्यक असलेला अनुभव, वाहतूक नियमांची परिपूर्ण माहिती आणि रस्त्यावर अचानक निर्माण होणाऱ्या प्रसंगांचा अंदाज घेण्याची मानसिक व शारीरिक क्षमता अल्पवयीन मुलांमध्ये पुरेशी विकसित झालेली नसते. या पार्श्वभूमीवर, मुलांचा हट्ट पुरवण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या आणि वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या हाती वाहने सोपवू नका, असे सडेतोड व कळकळीचे आवाहन नवेगाव बांध चे ठाणेदार अजित पाटील यांनी पालकांना केले आहे. सध्या अनेक अल्पवयीन मुले वेगाच्या नशेत, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून किंवा केवळ मित्रांच्या प्रभावापोटी भरधाव वेगाने वाहने चालवताना आढळतात; मात्र रस्त्यावरील काही क्षणांचा निष्काळजीपणा अत्यंत भीषण अपघाताला कारणीभूत ठरू शकतो. वाहनावरील ताबा सुटणे, ऐनवेळी ब्रेक न लागणे, समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न येणे, धोकादायक वळणावर योग्य ती दक्षता न घेणे आणि सिग्नल किंवा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे यामुळे अल्पवयीन मुले स्वतःच्या आयुष्यासोबतच रस्त्यावरून जाणाऱ्या इतर निष्पाप नागरिकांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण करत आहेत. पालकांनी काही क्षणांच्या आनंदासाठी किंवा सोयीसाठी मुलांच्या हाती वाहन देऊन त्यांच्या आयुष्याला अनावश्यक धोक्यात लोटू नये, कारण एकदा अपघात घडून अघटित घडल्यास त्यानंतर होणारा पश्चात्ताप आणि अश्रू कोणत्याही परिस्थितीत झालेली हानी भरून काढू शकत नाहीत. यासाठी मुलांचे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना वाहनांपासून दूर ठेवणे, तसेच त्यांना लहानपणापासूनच वाहतुकीचे नियम, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर, वेगावरील नियंत्रणाचे महत्त्व आणि रस्ता सुरक्षेचे संस्कार देणे अत्यंत गरजेचे आहे. जर कोणतीही अल्पवयीन व्यक्ती रस्त्यावर वाहन चालवताना आढळली, तर केवळ त्या मुलावरच नाही तर परिस्थितीनुसार त्याच्या पालकांवर किंवा संबंधित वाहनमालकावरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नवेगाव बांध पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आला आहे. मुलांच्या सुरक्षिततेची पहिली आणि मुख्य जबाबदारी ही पोलिसांची नसून पालकांचीच आहे, त्यामुळे मुलांचा हट्ट मोडून काढणे, त्यांना योग्य वयाची वाट पाहण्यास सांगणे आणि सुरक्षित वाहनचालनाबाबत योग्य मार्गदर्शन करणे हे पालकांचे आद्य कर्तव्य ठरते. “मुलांच्या हट्टाला बळी पडून त्यांच्या हाती वाहने देऊ नका; तुमची एक छोटीशी चूक मुलांच्या आयुष्यावर कायमस्वरूपी अनिष्ट परिणाम करू शकते. मुलांचा हट्ट अवघ्या काही क्षणांचा असतो, पण अपघाताचा परिणाम संपूर्ण आयुष्यभराचा असू शकतो,” असे स्पष्ट करत नवेगाव बांध चे ठाणेदार अजित पाटील यांनी “वेग नको, जीव हवा! नियम पाळा, सुरक्षित राहा!” असा अत्यंत मोलाचा व कडक संदेश सर्व पालकांना व नागरिकांना दिला आहे.





