– स्मार्ट’सोलर योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
संदीप कांबळे, कामठी :- दारिद्ररेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील घरगुती वीज ग्राहकाना वीज बिलाच्या त्रासातून कायमची मुक्ती देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.’स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफ टॉप सोलर म्हणजेच स्मार्ट योजनेची घोषणा करण्यात आली असून या योजने अंतर्गत कामठी तालुक्यातील शहर व ग्रामीण परिमंडळातील मोठ्या संख्येतील वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत तसेच अश्या पात्र लाभार्थ्यांची यादी महावितरण कडे आलेली आहे.या योजनेत केंद्र सरकारच्या अनुदानासोबतच राज्य शासनाकडून भरघोस अतिरिक्त अनुदान मिळणार असल्याने आता सर्वसामान्यांच्या छतावर सौर ऊर्जा (रुफ टॉप सोलर) बसविणे अत्यंत सोपे आणि खिशाला परवडणारे झाले आहे .’प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर राबविल्या जाणाऱ्या या सुवर्णसंधिचा कामठी तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण कामठी चे अधिकारी राठोड यांनी केले आहे. या कल्याणकारी योजनेच्या व्याप्तीचा विचार केल्यास या योजनेत प्रत्येक घटकाला सामावून घेण्याचा शासनाचा मानस आहे.1 किलोवेट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी अंदाजे 50 हजार रुपये खर्च येतो .केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत यासाठी 30 हजार रुपयांचे अनुदान आधीच दिले जात आहे आता यात राज्य शासनाने आपल्या ‘स्मार्ट’ योजनेची भर घालत दारिद्र रेषेखालील ग्राहकासाठी 35 टक्के म्हणजे 17 हजार 500 अतिरिक्त अनुदान जाहीर केले आहे त्यामुळे या घटकातील ग्राहकांना 50 हजार रुपयांचा हा प्रकल्प उभारण्यासाठी स्वतःच्या खिशातून अवघे 2500 रुपये खर्च करावे लागतील.तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना 30 टक्के तर सर्वसाधारण गटाला 20 टक्के अतिरिक्त अनुदान मिळणार असल्याने त्यांचा प्रत्यक्ष आर्थिक वाटा अवघ्या 5 ते 10 हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ग्राहकांनी विनाविलंब राष्ट्रीय सौर पोर्टल वर (नॅशनल पोर्टल)आपली नोंदणी करावी आणि आपले घर स्वयंपूर्ण बनवावे असे आवाहन महावितरण ने केले आहे.