– टंकलेखन चाचणी पुन्हा घेण्यात यावी. जीसीसी- टीबीसी असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र हेडाऊ
– टंकलेखन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पत्रपरिषदेत न्यायासाठी धाव
नागपूर :- मुंबई उच्च न्यायालय व इतर खंडपीठांच्या लिपिक भरतीसाठी घेण्यात आलेल्या संगणक टंकलेखन परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. लिपिकांच्या 1,332 जागांसाठी 16 जुलै रोजी, ही परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखन परीक्षेला राज्यभरातून 11,305 परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. यापूर्वी लिपिक भरतीची परीक्षा न्यायालय प्रशासनामार्फत घेण्यात येत होती. परीक्षार्थींना हार्ड कॉपी देऊन त्यातील मजकूर संगणकावर टंकलिखित करावा लागत होता. मात्र, यंदा प्रथमच ‘स्क्रीन टू स्क्रीन’ पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. या पद्धतीत स्क्रीनवरील अक्षरांचा आकार लहान असल्याने स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, विसर्ग यांसारखी चिन्हे स्पष्ट दिसत नसल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली. त्याशिवाय उतारा टंकलिखित करतांना अक्षरे उशिराने स्क्रीनवर उमटत असल्याने टंकलेखनाच्या गतीवर परिणाम झाला. काही परीक्षा केंद्रांवरील की- बोर्डवर धूळ साचलेली होती, तर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे की- बोर्ड असल्याने ते व्यवस्थित कार्यरत नसल्याचा आरोप करण्यात आला. टंकलेखन परीक्षेतील नियमही पाळले गेले नसल्याचा दावा जीसीसी- टीबीसी असोसिएशनचे अध्यक्ष देवेंद्र हेडाऊ यांनी केला. परीक्षेसाठी 40 शब्द प्रतिमिनिट गतीची अट असताना, उताऱ्यातील शब्दांची गणना केल्यास प्रत्यक्ष गती 53.32 शब्द प्रतिमिनिट इतकी होती. भंडारा जिल्ह्यातून परीक्षा दिलेल्या पल्लवी शेंडे म्हणाल्या की, तीन बॅचमध्ये परीक्षा होती. पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना केंद्रावर 11 ते 11.15 पर्यंत पोहचायचे होते. विद्यार्थी 10 वाजता पासून परीक्षा केंद्रावर पोहचले. मात्र नेटवर्कच्या समस्या, तांत्रिक त्रुटी यामुळे 5 वाजता. विद्यार्थी केंद्राबाहेर पडले. तर दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी 6 वाजता. केंद्रावर गेले. तर तिसऱ्या बॅचची परीक्षाच झाली नाही.
– पुनरपरीक्षा घेण्यात यावी
परीक्षेच्या संदर्भात राज्यभरातून विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय. न्यायालयाने टंकलेखनाची पुनर्परीक्षा घ्यावी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या धर्तीवर न्यायालय प्रशासनानेच ती आयोजित करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. पत्रकार परिषदेला उपस्थित देवेंद्र हेडाऊ, सारंग मौंदेकर, तेजस मोटघरे, प्रज्वल ताटे, पल्लवी शेंडे, सायली मसारे, राधा दहाले, प्रियंका काद्रेल, ऐश्वर्या मेश्राम, श्वेता टेंभुर्णे, अजित रडके, रजत सोंडावले आणि संकल्प लांजेवार यांची उपस्थिती होती.





