पांढरवडा प्रकल्पात 219 गावे, बेड्यांवर होणार शिबिर
यवतमाळ, दि.11 (जिमाका) : धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत पांढरकवडा एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या गावांमध्ये जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात थेट गावात जावून नागरिकांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील केळापुर, झरी जामणी, घाटंजी, कळंब, यवतमाळ, राळेगाव, मारेगाव, वणी व बाभुळगाव यातालुक्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या कोलाम या आदिम जमातीच्या नागरिकांकरीता मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, जातीचे दाखले. राशन कार्ड, बॅंक खाते, किसान क्रेडीट कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, किसान सन्मान निधी, जाँब कार्ड व वनहक्क दावे असे अनेक दाखले त्यांच्या वास्तव्यावर जाऊन उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील एकूण 98 गावांमध्ये 98 कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सदर कॅम्पच्या माध्यमातून एकूण 23 हजार 975 जातीचे प्रमाणपत्र, 19 हजार 135 आधारकार्ड, 5 हजार 491 जॉब कार्ड. 25 हजार 53 राशन कार्ड, 5 हजार 755 बँक खाते, 302 वैयक्तीक वनहक्क दावे, 23 हजार 860 आयुष्मान भारत कार्ड, 23 हजार 117 पीएम किसान योजना इत्यादी दाखले देण्यात आले आहे. मंजुर लक्षांक 43 पैकी 22 बहुद्देशीय केंद्रांचे बांधकाम लवकरच पुर्ण होणार असून त्यात बहुउद्देशिय हॉल, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र व वनधन विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
अभियानात निवड झालेल्या गावात ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून अंतर्गत रस्ते, नाल्या व 9 अंगणवाडीचे बांधकाम, मोबाईल मेडीकल युनिट मोबाईल कनेक्टीव्हीटी, 3 वसतिगृहांचे बांधकाम ही कामे मंजूर करण्यात आलेली असुन ही कामे प्रगतीवर आहेत.
पीएम जनमन या योजनेच्या आधारावर धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या योजनेंतर्गत संपुर्ण अनुसूचित जमातीच्या नागरीकांच्या सर्वांगीन विकासासाठी योजनेंतर्गत भारत सरकारचे १७ मंत्रालय २५ प्राथम्य क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. पांढरकवडा प्रकल्पातील 9 तालुक्यांतील एकूण 219 आदिवासी गावांची निवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये वसतीगृहाचे बांधकाम, वर्गखोल्यांचे बांधकाम व बहुउद्देशिय मार्केटींग सेंटर ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.
याच अभियानाचा एक भाग म्हणून धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या योजनेंतर्गत जूनमध्ये विशेष मोहिम राबवून पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील 219 गावे व पारधी बेड्यांवर दिनांक 15 जुन ते 30 जुन पर्यंत सकाळी 10 ते सांयकाळी 5.30 वाजेपर्यंत जनजागृती शिबिराच्या माध्यमातून मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जॉब कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पीएम-किसान, जनधन खाते असे अनेक दाखले व योजनांचा लाभ एका छताखाली व प्रत्यक्ष ग्रामस्तरावर जाऊन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या गावांमध्ये स्टॉल लावून तेथे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, नोडल अधिकारी हे शिबिराच्या ठिकाणी राहणार आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पांढरकवडाचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांनी केले आहे.





