गडचिरोली :- शासनाने दिनांक 02 जुन ,2026 व 15 जुलै 2026 रोजीच्या संदर्भिय शासन निर्णयान्वये “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६” ही योजना जाहिर केलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांकडील दि. 01.04.2019 ते दि. 31.03.2025 पर्यंत उचल केलेल्या पिक कर्जाची दि.30.09.2025 अखेर थकीत असलेली व दि. 31.03.2026 अखेर परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह शेतकऱ्यांना त्यांच्या कर्ज खात्यात रु.2.00 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल.
सन २०२३-२४ अथवा सन २०२४-२५ या वर्षात घेतलेल्या व त्याची विहीत कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची प्रति शेतकरी रु. ५० हजार इतक्या अधिकतम रकमेपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल.
राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून दिनांक 24.07.2026 रोजी प्राप्त झालेल्या असुन सदर यादया दिनांक २५ व 26 जुलै २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, जि.म.स. बँक, राष्ट्रीयकृत बँक,ग्रामीण व व्यापारी बँकेच्या शाखेत, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 6423 शेतकरी पात्र ठरले असून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक कार्यवाही करावी. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी पात्र शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, यादीतील आपला क्रमांक किंवा आधार क्रमांक घेऊन जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तातडीने जाऊन बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे जेणेकरून कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत प्राप्त होऊ शकेल. सदर आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया ही विनामुल्य असून कोणत्याही केंद्रावर पात्र लाभार्थ्यांकडुन रक्कम आकारण्यात येणार नाही. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.





