नागपूर :- 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन हा केवळ सुट्टीचा दिवस न राहता तो राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा व्हावा, या उद्देशाने ‘एक वादळ भारताचं’ या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने फुटाळा तलाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मिशन राजपथ–Stand for Nation’ अभियानाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी सकाळपासून या राष्ट्रभक्तीपर सोहळ्यात सहभाग घेतला होता. सकाळी सामूहिक राष्ट्रगीत गायनाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. कार्यक्रमात विविध देशभक्तीपर उपक्रमांसह ढोल – ताशा पथके, स्केटिंग टीम, अश्वदल सलामी तसेच आदिवासी कलाकारांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी तिरंगा हातात घेत हजारो नागरिकांनी राष्ट्रगीतासाठी एकत्र उभे राहत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. सामूहिक राष्ट्रगीत ठरले मुख्य आकर्षण सकाळी १०.३० वाजता ५२ सेकंदांचे सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. हजारो नागरिकांनी एकाच स्वरात राष्ट्रगीताचे गायन केल्याने फुटाळा तलाव परिसरात अभूतपूर्व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. ‘एक वादळ भारताचं’ या अभियानाला देशभरातूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, ४५० हून अधिक ठिकाणी नागरिकांनी सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी होत स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

कार्यकर्त्यांच्या नियोजनातून अभियान यशस्वी
नागपूर शहर समन्वयक अंकित क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हितेश डाफ, अनुराग पाटणे, विपुल लोखंडे, रिया खोब्रागडे, ललित सानेसर, अमेय पांडे, निक्कू हिंदुस्तानी, नील शाहू, अवंतिका डवले आणि प्रणय श्रीखंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन यशस्वीपणे सांभाळले. या अभियानासाठी श्रीराम बालसंस्कार शाळा, भीम टायगर, JD कॉलेज, YCC रोट्रॅक्ट, प्रियदर्शिनी भगवती कॉलेज आणि नेक्सस अकादमी यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच शासकीय माजी सैनिक संघटना, शिवशक्ती आखाडा, रमाई लेझीम पथक, लालसिंग स्पोर्ट्स अकादमी, शिवराजे व दोनच राजे ढोल- ताशा पथक, हॉर्स रायडिंग असोसिएशन आणि विवेकानंद पब्लिक स्कूल यांनीही कार्यक्रमाला सहकार्य केले. देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश ‘एक वादळ भारताचं’ हे स्वयंसेवकांच्या माध्यमातून कार्य करणारे राष्ट्रप्रेरित अभियान असून देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि जबाबदार नागरिकत्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यावर्षीच्या ‘मिशन राजपथ’ अभियानाला देशभरातून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय अभिमानाचा उत्सव म्हणून साजरा केला, अशी भावना अभियानाचे देशाचे मुख्य संयोजक वैभव शिंदे पाटील यांनी व्यक्त केली.





