भंडारा :- “राज्यातील शेतकरी हा केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेले निर्णय केवळ घोषणा नसून ते शेतीक्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे ऐतिहासिक पाऊल आहे,” असे प्रतिपादन भाजप नेते संजय भेंडे यांनी केले. भंडारा येथे आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या विविध शेतकरी हिताच्या योजनांचा सविस्तर आढावा घेत सरकारचे आभार मानले.
कर्जमुक्ती आणि वीजबिल माफीतून शेतकऱ्यांना मोठा दिलासा पत्रकार परिषदेत माहिती देताना संजय भेंडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने लाखो शेतकऱ्यांचे ओझे हलके केले आहे. विशेषतः ७.५ एचपीपर्यंतच्या कृषी पंपांची वीजबिल थकबाकी माफ करण्याचा निर्णय क्रांतिकारी ठरला आहे. आता शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, यामुळे ग्रामीण भागातील अर्थचक्राला मोठी गती मिळणार आहे.
आधुनिक शेती आणि ‘एआय’चा वापर केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा, कृषी यांत्रिकीकरण, आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या उपक्रमांमुळे शेती अधिक सुलभ होणार आहे. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेतीचे प्रयोग राबवून उत्पादकता वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे भेंडे यांनी आवर्जून नमूद केले.
कापूस, कांदा आणि सोयाबीन उत्पादकांसाठी सुरक्षा कवच पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि कापूस, कांदा, सोयाबीन खरेदीसाठी शासनाने उचललेली ठोस पावले यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबले आहे. महिला शेतकरी सक्षमीकरणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांनाही मुख्य प्रवाहात आणले जात आहे. या सर्व निर्णयांमुळे राज्यातील बळीराजा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष मधुराताई मदनकर, भगवान चांदेवार, मयूर बिसेन, कल्यानी निखाडे, चैतन्य उमाळकर, चंद्रकलाताई भोपे, सचिन घनमारे, नितीन गायधने, शैलेश खरोले, तिलक वैद्य, संदीप मेश्राम, वृषाली ब्राह्मणकर, प्रीती गाढवे, निमेश ढोकरीमारे, विजय लिचडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल संजयजी भेंडे यांनी संपूर्ण शेतकरी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.





