हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करचखेडा येथील वैनगंगा नदी पात्रात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. पवन मुरली चौबे (३४, रा. आंबेडकर वार्ड) आणि कृष्णा जगन्नाथ बोकडे (२६, रा. चांदणी चौक) अशी मृतांची नावे आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी राबविलेल्या अथक शोधमोहिमेनंतर अखेर दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे.
रविवार, ७ जून रोजी सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास करचखेडा येथील सात तरुण एका बोटीने वैनगंगा नदीच्या पात्रातील एका बेटावर आंघोळीसाठी गेले होते. यामध्ये काशिनाथ मेश्राम (३२), अर्जुन मेश्राम (२९), कृष्णा बोकडे (२६), आकाश केवट (२८), सुबोध ढोक (२६), मृणाल मंजूरकर (२६) आणि पवन चौबे (३४) यांचा समावेश होता.
आंघोळ आटोपून सायंकाळी परत येत असताना अचानक जोराचे वादळ आले. नदीच्या मध्यभागी असतानाच बोटीमध्ये पाणी शिरले आणि संतुलन बिघडल्याने बोट उलटली. या अपघातात सातपैकी पाच जणांनी पोहोत नदीचा काठ गाठला, मात्र कृष्णा बोकडे आणि पवन चौबे हे दोघे नदीच्या प्रवाहामध्ये बेपत्ता झाले.
घटनेची माहिती मिळताच कारधा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्र झाल्याने आणि अंधार असल्याने शोधकार्यात अडथळे आले होते. मात्र, आज सकाळी कारधा पोलीस स्टेशनचे पीआय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक मासेमारांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. पीआय सूर्यवंशी यांनी स्वतः उपस्थित राहून रात्रंदिवस मेहनत घेतली आणि शोध मोहिमेचे नियोजन केले. अखेर काही तासांच्या शोध सत्रानंतर या दोन्ही तरुणांचे मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले.







