spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवीन ‘एसओपी’ निश्चित करणार – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

– जपतलई सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचे सांत्वन; घटनास्थळाची पाहणी

– मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत; मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त ५ लाखांसाठी प्रस्ताव”

गडचिरोली :- धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येतील. तसेच आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात येईल, असे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

जपतलई (ता. धानोरा) येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात रात्री सुमारे २ वाजता विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दीपिका इतवा लकडा (वर्ग ६), सुष्मिता सरोजीत मंडल (वर्ग ८) आणि अनु गाजुरं कोरेटी (वर्ग २) या तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

सर्पदंश झालेल्या अन्य विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर प्रकृती असलेल्या दीपीका मडावी या विद्यार्थिनीला प्रशासनाने एअरलिफ्ट सुविधेद्वारे पुढील उपचारासाठी हलवून आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले.

सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी आज धानोरा येथील शवागृहात मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर जपतलई येथील आश्रमशाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश उपस्थित होते.

“आजची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कुटुंबीयांची भेट आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर काही बाबींमध्ये अधिक जागरूकतेने व जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले आहे. काही स्तरांवर झालेल्या त्रुटींचा आढावा घेऊन भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी प्रत्येकाने आवश्यक दक्षता घेणे गरजेचे आहे,” असे ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.

१४ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

आश्रमशाळांच्या व्यवस्थापन व विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात गठित विविध समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासह शासन व्यवस्थेत आवश्यक बदल करण्याच्या दृष्टीने १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची बैठक घेण्यात येणार असल्याचे ॲड. जयस्वाल यांनी सांगितले. या बैठकीत विद्यार्थी सुरक्षा, आश्रमशाळा व्यवस्थापन, विविध समित्यांचे कामकाज, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि संबंधितांची जबाबदारी यांचा आढावा घेऊन नवीन एसओपी निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुटुंबीयांना आर्थिक मदत –

दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असून, त्यापैकी प्रत्येकी १ लाख रुपयांची तात्काळ मदत सुपूर्द करण्यात आली आहे. उर्वरित मदतीची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी अतिरिक्त ५ लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. अन्य शासकीय योजनांमधूनही संबंधित कुटुंबीयांना शक्य ते सर्व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.