Monday, April 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कितीही विरोध झाला तरी भाजपा महिलांना आरक्षण मिळवून देणारच

– भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष आ. चित्रा वाघ यांचा निर्धार

मुंबई :- महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो महिलांचा आक्रोश स्वस्थ बसू देणार नाही, अशी घणाघाती टीका करत कितीही विरोध झाला तरी महिलांना आरक्षण मिळवून देण्याचे लक्ष्य भाजपा गाठणारच, असा निर्धार भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ यांनी शनिवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपा प्रदेश सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते.

आ. चित्रा वाघ यांनी सांगितले की, मागील तीस वर्षांपासून ज्या 33 टक्के महिला आरक्षणाच्या विधेयकाची आम्ही वाट पहात होतो ते काँग्रेस आणि विरोधकांमुळे फेटाळले गेले. राज्यातील उबाठा गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादीही त्यात सहभागी होते. महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या, शाहू, फुले, डॉ. आंबेडकर यांची विचारधारा सांगणाऱ्यांनी खरोखरच देशातील महिलांना त्यांचे हक्क देण्याची वेळ आली तेव्हा मात्र आपला हात आखडता घेतला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची सुरुवात झाली होती. महिलांना मतदानाचा अधिकार देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले. गेले दशकभर यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना सशक्त करण्यासाठी काम करत आहेत. महिलांसाठी त्यांनी अनेकविध योजना आणल्या. आता नारी शक्ती वंदन विधेयकाद्वारे संसदेत, प्रत्येक राज्याच्या विधानसभेत 33 टक्के महिलांचा आवाज घुमणार होता. मात्र या विधेयकाला विरोध करत महिलांना पायदळी तुडवण्याचे काम केले गेले. लोकप्रतिनिधीपदापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वसाधारण घरातील मुली परिश्रम करतात. पण यांना सर्वसाधारण घरातील मुली मुख्य प्रवाहात आलेल्या विरोधकांना नको आहेत. आपल्याच लेकी सुनांना आणून यांना त्यांचीच मक्तेदारी चालवायची आहे. विरोधकांच्या या विरोधामुळे त्यांचा बुरखा टराटरा फाटला आहे, अशी घणाघाती टीकाही आ. चित्रा वाघ यांनी केली.

भाजपा महिलांचा गैरवापर करत आहे, या प्रियांका गांधी यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेत आ. चित्रा वाघ म्हणाल्या की, वापर करण्यासाठी महिला या काही वस्तू नाहीत. भाजपात महिलांवर अन्याय केला जात नाही तर भाजपा कायम महिलांचा सन्मानच करते. भाजपाने काढलेल्या मोर्चाच्या निमित्ताने लाखो महिलांचा आवाज तुमच्या कानापर्यंत गेला नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. मात्र लाखो महिलांना अधिकार आणि हक्क मिळवून देण्याचे आमचे जे मुख्य ध्येय आहे त्यापासून आम्ही किंचितही ढळणार नाही. आमचा आवाज दिवसेंदिवस बुलंद होत जाईल आणि येत्या काळात देशाचे सर्वोच्च सभागृह संसद आणि प्रत्येक राज्यातील विधानसभेत सर्वसामान्य महिला प्रतिनिधित्व करताना दिसतील असे आ. चित्रा वाघ यांनी नमूद केले.

लैंगिक शोषणाचे प्रकार पुढे येत असल्याबद्दल त्या म्हणाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांच्यावर विश्वास असल्यानेच मुली अशा प्रकरणात तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. याचप्रमाणे दबाव झुगारून त्यांनी निडरपणे तक्रारी करण्यासाठी पुढे यावे. कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडण्यात येणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होईल, याची खात्री महिलांनी बाळगावी, असे आ. चित्रा वाघ यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.