कामठी :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यापीठाच्या रनाळा, कामठी सेवा केंद्रात विशेष योग व राजयोग मेडिटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने बंधू-भगिनी, माता, युवक-युवती आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेत योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाची सुरुवात ईश्वरीय स्मृतीने करण्यात आली. यावेळी सेवाकेंद्र संचालिका बीके प्रेमलता यांनी सांगितले की, योग हे केवळ शरीर निरोगी ठेवण्याचे माध्यम नसून मन, बुद्धी आणि संस्कारांना सशक्त बनविण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. राजयोगाच्या नियमित सरावामुळे तणाव, चिंता आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते तसेच व्यक्ती शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम बनते.
राजयोग मेडिटेशनमुळे मनाची सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मन अधिक संयमी व संतुलित बनते. मनाचा प्रभाव शरीरावरही होत असल्याने शरीराच्या आरोग्यात सुधारणा होऊन व्यक्ती निरोगी जीवनाकडे वाटचाल करू लागते. प्रत्येकाने नियमितपणे राजयोग मेडिटेशनाचा सराव करावा, असे आवाहन बीके प्रेमलता यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेकजण मानसिक समस्यांना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत राजयोग मेडिटेशन आत्मिक शांती, सकारात्मकता आणि अंतर्गत शक्ती प्रदान करून जीवनात संतुलन निर्माण करण्याचे प्रभावी साधन ठरते.
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी योगासने व राजयोग मेडिटेशनचा सामूहिक सराव करून विश्वशांती आणि मानवकल्याणासाठी सकारात्मक संकल्प केले. तसेच योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारणे, नशामुक्त समाजाची निर्मिती आणि नैतिक मूल्ये जीवनात रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी नागरिकांनी दररोज काही वेळ योग व ध्यानासाठी देण्याचा संकल्प केला. राजयोगाच्या नियमित सरावामुळे जीवनात शांती, आनंद आणि आत्मविश्वासाची अनुभूती मिळते व त्यामुळे कुटुंब आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




