◼️पीक स्पर्धेसाठी करा आता ऑनलाईन अर्ज : तालुका कृषी अधिकारी
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उत्पादन घेता यावं आणि त्यांच्यात स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रयोगशील आणि मेहनती शेतकऱ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुनील कोरटे यांनी केले आहे. त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीपपीकस्पर्धा जाहीर करण्यात येत आहेत. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत धरून स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशा एकूण ११ खरीप पिकांमध्ये स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी शेतकऱ्याच्या नावावर स्वतःची जमीन असावी व ती तो स्वतः कसत असावा. भात पिकांसाठी किमान २० आर इतर पिकांसाठी किमान ४० आर (१ एकर) सलग लागवड आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. ही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून विजेते पुढे जिल्हा व राज्यस्तरावर निवडले जातील. अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळ, तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकाकडून कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
मूग व उडीद पिक : १० ऑगस्ट २०२६
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल : ३१ ऑगस्ट २०२६
◼️अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
🔹 फार्मर आयडी
🔹विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
🔹नकाशा
🔹चलनाची प्रत
🔹सातबारा, नमुना ८ अ उतारा
🔹जात प्रमाणपत्र (आदिवासी गटासाठी)
🔹बँक खाते तपशील (पासबुक/चेक प्रत)





