नागपूर :- रिपब्लिकन पक्षातील अनेक नेत्यांनी केवळ सत्तेची मलाई चाखण्याच्या राजकारणात गुंतून पक्षाची वाताहत केली. त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी टीका आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली.
माध्यमांशी संवाद साधताना बागडे म्हणाले की, तरुण कार्यकर्ते अभिजित दीपके यांनी आंबेडकरी बाणा दाखवत पुन्हा एकदा चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्यातून रिपब्लिकन पक्षातील मस्तवाल आणि स्वार्थी नेत्यांनी धडा घ्यावा. पक्षाची ताकद वाढविण्याऐवजी अनेक नेत्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी रिपब्लिकन चळवळीचे नुकसान केले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
क्रोक्रॉझ जनता पार्टी बाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बागडे म्हणाले की, भारताच्या इतिहासात प्रथमच विविध जाती, पंथ आणि धर्म यापलीकडे जाऊन केवळ भारतीयत्व आणि भारतीय संविधान या तत्त्वांच्या आधारावर देशातील युवक रस्त्यावर उतरून लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही देशासाठी सकारात्मक आणि आशादायी बाब आहे. ते पुढे म्हणाले की, संविधान निर्मात्यांनी ज्या समताधिष्ठित आणि लोकशाहीवादी भारताचे स्वप्न पाहिले होते, ते साकार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, ते अनेक आंबेडकरी नेते त्या जबाबदारीत अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता त्यांनी आपली राजकीय दुकानदारी बंद करून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. देशातील युवक संविधानवादी विचारांच्या आधारे एकत्र येत असल्याचे चित्र आशादायक असून, यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल, असा विश्वासही नारायण बागडे यांनी व्यक्त केला.







