– नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पांढरकवडा :- सतत सुरू असलेल्या पावसामुळे केळापूर तालुक्यातील सायखेडा मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ़ झाली असून, बुधवारी दि. २२ सकाळी ६.३० वाजेपर्यंत प्रकल्प ९४.४० टक्के भरल्याची माहिती पाटबंधारे शाखा, सायखेडा यांनी दिली आहे. याबाबतचा अहवाल सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, केळापूर यांना सादर करण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरण अल्पावधीत शंभर टक्के भरू शकते. सायखेडा मध्यम प्रकल्प हा द्वारविरहित असल्याने धरणात येणारा अतिरिक्त पाण्याचा प्रवाह नियंत्रित करता येत नाही. परिणामी, अतिरिक्त पाणी सांडव्यावरून नदीपात्रात वाहणार असून,पावसाच्या तीव्रतेनुसार नदीला पूर येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. संभाव्य पुराच्या पाश्वभूमीवर सायखेडा, लिगंटी, मोरवा, पिंपरी, आकोली, पांढरकवडा, केळापूर, तातापूर, झुंजारपूर, ढोकी, साखरा, बल्लारपूर, वा-हा, कवठा आणि पाटणबोरी ही नदीकाठची गावे प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाने संबंधित यंत्रणांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असून, आवश्यक ती खबरदारी व आपत्कालीन उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.





