– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल
मुंबई :- सर्पदंशामुळे गडचिरोलीच्या आश्रमशाळेत तीन विद्यार्थींनीचे मृत्यू होण्याच्या अतिशय दुर्दैवी प्रकरणाला राजकीय वळण देत आपली पोळी भाजून घेणाऱ्या जनाब संजय राऊत यांनी आधी ही आश्रमशाळा नेमकी कुणाची होती, हे तपासले असते तर बरे झाले असते. ही आश्रमशाळा काँग्रेसचे खासदार राहिलेले मारोतराव कोवासे यांची आहे. त्यामुळे या प्रकरणात सरकारला आणि आदिवासी विकास मंत्र्यांना प्रश्न विचारणारे संजय राऊत ज्या काँग्रेसच्या संस्थाचालकाची ही आश्रमशाळा आहे त्या काँग्रेसला जाब विचारणार आहेत का, असा सवाल भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्य सरकारने या प्रकरणाची अतिशय गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यात लक्ष घातले आहे. ही आश्रमशाळा चालवण्यासाठी राज्य सरकारकडून संस्थाचालकांना प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दोन हजार रुपये अनुदान दिले जाते आणि संपूर्ण जबाबदारी त्या संस्थेची असते. संबंधित आश्रमशाळेलगत लाकडाचे ढिगारे तर खिडकीलगत विटा रचून ठेवण्यात आल्या होत्या. त्या विटांवरून साप आश्रमशाळेत गेला. विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्याचे आणि स्वच्छता ठेवण्याचे काम या संस्थेने का केले नाही ? संजय राऊत, तुम्ही एवढ्याच पोटतिडकीने काँग्रेसला याबद्दल जाब विचारणार आहेत का? मारोतराव कोवासे त्या संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत का? काँग्रेसच्या पदावरून मारोतराव कोवासे यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहात का, असे प्रश्न बन यांनी उपस्थित केले.
सध्या दिल्लीत बसून असलेल्या संजय राऊत यांनी राहुल गांधींकडेही हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे. आता राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ या काँग्रेसच्या नेत्यावर काय कारवाई करणार आहेत, याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे आणि मोर्चा काढायचा असेल तर आधी त्या संस्थाचालकांच्या घरावर काढा आणि मग या संदर्भात सरकारला प्रश्न विचारा, असे बन यांनी सुनावले.
बन पुढे म्हणाले, आपल्याला सर्पदंश झाल्याचे त्या विद्यार्थिनीच्या उशिरा लक्षात आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेता आले नाही. मात्र ही दुर्घटना घडल्याचे समजताच तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर हेलिकॉप्टरची व्यवस्था करून विद्यार्थिनींना उपचारासाठी नेण्यात आले. वर्षा निवासस्थानी किंवा मंत्र्यांच्या बंगल्यावर साप सोडा, असे आवाहन करणाऱ्या संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या घरावर किती साप सोडायचे, हे सांगावे. विद्यार्थ्यांची सुरक्षा पाहण्याची प्राथमिक जबाबदारी असेलल्या संस्थाचालक काँग्रेस नेत्याच्या तसेच हर्षवर्धन सपकाळ यांच्या घरात साप सोडणार आहात का ? संजय राऊत, सध्या तुम्ही दिल्लीत आहात, आता राहुल गांधींच्या घरी साप सोडणार आहात का?
तिरंगा रॅलीत तिरंगा घेऊन येणारे हे मनोरुग्ण असल्याचा हास्यास्पद दावा संजय राऊत यांनी केला आहे. याच तिरंग्यामुळे तुम्ही स्वातंत्र्यामध्ये जगू शकताय. हा तिरंगा नसता तर तुम्हाला इंग्रजांची गुलामगिरी करावी लागली असती. आताही तुमच्यात आणि गुलामांमध्ये तसा फारसा फरक नाही. कारण पूर्वी इंग्रजांची गुलामगिरी करायची, आता तुम्ही राहुल गांधी आणि सोनिया गांधींची गुलामगिरी करताय. तुम्ही तिरंग्याचा अपमान केल्याने या देशातील, महाराष्ट्रातील जनता तुम्हाला पुन्हा एकदा धडा शिकवेल, असे बन यांनी सुनावले.





