हंसराज, भंडारा :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र पण प्रलंबित लाभार्थी शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तालुकास्तरीय विशेष शिबिरे घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला हे यश मिळाले आहे.
जिल्ह्यात २२,३८५ पात्र शेतकऱ्यांपैकी २,१७९ शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक व फार्मर आयडी उपलब्ध नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया रखडली होती. तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी काँग्रेसने विशेष शिबिरांची मागणी केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीची तातडीने दखल घेत संबंधित विभागांची बैठक घेऊन प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती मिळणार असून, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा लढा आणि पाठपुरावा कायम राहील,” असे मुकुंद साखरकर यांनी सांगितले. काँग्रेसच्या या पुढाकाराचे जिल्ह्यात स्वागत होत आहे.





