spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या – रोहयो मंत्री भरत गोगावले

मुंबई :- ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामांची संख्या वाढविण्यासह मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. रोजगार हमी विभाग हा सर्वसामान्यांच्या हाताला काम देणारा आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देणारा महत्त्वाचा विभाग असल्याचे नमूद करत राज्यातील कोणत्याही पात्र नागरिकाला कामाची कमतरता भासू नये, यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘व्हीबी जी राम जी’ योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. याअनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री गोगावले यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विभागाचे सचिव आप्पासो धुळाज यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आणि जिल्हास्तरीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

मंत्री गोगावले यांनी ‘व्हीबी जी राम जी’ योजनेतील नंदुरबार जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे अहिल्यानगर, यवतमाळ, नाशिक, चंद्रपूर, जळगाव, अमरावती, नांदेड, बुलढाणा, लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये झालेल्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ज्या जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी कामे सुरू आहेत, त्या जिल्ह्यांनी तातडीने कामांची संख्या वाढवून नागरिकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

या योजनेत आता 318 प्रकारची कामे घेण्याची सुविधा उपलब्ध असून यामध्ये घरकुलांसह विविध विकासकामांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या कामांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले. शाळांमधील कंपाऊंडच्या भिंती, स्वच्छतागृहे, तसेच इतर भौतिक सुविधा निर्माण करण्याची कामेही या योजनेतून हाती घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपत्ती निवारण, जलसंधारण, सिंचन विहिरी यांसारख्या कामांना प्राधान्य देऊन ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यावर त्यांनी भर दिला.

योजनेअंतर्गत मजुरांना काम उपलब्ध होण्याबरोबरच त्यांच्या मजुरीचे वेळेत वितरण होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत शासनामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही मंत्री गोगावले यांनी दिली. निधी उपलब्ध असताना मजुरीचे वितरण प्रलंबित राहिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच ई-केवायसी पूर्ण करुनच मजुरांना काम देण्याचे निर्देश देत उपस्थिती व कामांची अचूक नोंद ठेवण्याची सूचना त्यांनी केली.

नरेगा अंतर्गत घरकुलांची प्रलंबित कामे आणि मंजुरी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत मंत्री गोगावले यांनी पंतप्रधान आवास योजनेतील कामांनाही गती देण्याचे आवाहन मंत्री गोगावले यांनी केले. पीएमएवाय-2 अंतर्गत राज्याला सुमारे 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्याचे जिल्हानिहाय वाटप लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सुमारे 2,850 कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा सुरू असून हा निधी लवकरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींना दिलेली उद्दिष्टे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधावा, योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री गोगावले यांनी दिले. योजनांच्या यशकथांना व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी पुस्तिका तयार करण्यात येणार असून यासाठी सिंचनवाढीची आकडेवारी संकलित करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढील पाच वर्षांचा विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.