नागपूर :- २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेत विविध धर्म, पंथ, परंपरा आणि सामाजिक समूहांची स्वतंत्र व अचूक नोंद करण्यात यावी, तसेच जनगणनेसोबत होणाऱ्या मॅपिंगमध्येही संबंधित समाजांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखींची योग्य नोंद घ्यावी, अशी मागणी सर्व धर्मीय सर्व पंथीय सामाजिक परिषद, नागपूर यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी, नागपूर, यांच्यामार्फत भारताचे जनगणना आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन भिक्खू ज्ञानज्योती, रेखा महाजन (कबीर पंथ), अतुल दिनकरराव देशमुख (शिक्षक भारती) आणि सुनील चौधरी (संस्थापक, सर्व धर्मीय सर्व पंथीय सामाजिक परिषद) यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर करण्यात आले. यावेळी प्रशांत ढोरे (ओबीसीमुक्ती मोर्चा), सुभद्रा यादव, भन्ते शांती ज्योती, नाना गेडाम यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्ते व विविध धर्म-पंथांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. निवेदनात बौद्ध समाजाची स्वतंत्र ओळख, भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारपरंपरेशी संबंधित माहिती, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, आदिवासी समाज, पारशी धर्म, वारकरी संप्रदाय, कबीर पंथ,महानुभाव पंथ तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि रमाबाई आंबेडकर यांसारख्या महत्त्वाच्या ऐतिहासिक-सामाजिक व्यक्तिमत्त्वांशी संबंधित माहिती जनगणनेच्या नोंदी व मॅपिंगमध्ये योग्य प्रकारे प्रतिबिंबित व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात विशेषतः बौद्ध समाजाच्या लोकसंख्येची अचूक नोंद करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. जनगणनेतील धार्मिक व सामाजिक आकडेवारी ही केवळ संख्या नसून धोरणनिर्मिती, सामाजिक न्याय, शैक्षणिक नियोजन आणि संसाधनांच्या योग्य वाटपासाठी महत्त्वाचा आधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अतुल दिनकरराव देशमुख यांनी यावेळी सांगितले की, “जनगणना म्हणजे केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नाही; ती समाजाच्या अस्तित्वाची अधिकृत नोंद असते. त्यामुळे प्रत्येक धर्म, पंथ आणि सामाजिक समूहाची ओळख अचूकपणे नोंदवली जाणे हा सामाजिक न्यायाचाच भाग आहे.” जनगणनेच्या वेळी पूर्वीच्या जनगणना नोंदींमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांची, धार्मिक- सामाजिक परंपरांची आणि संबंधित समुदायांची माहिती तपासून योग्य नोंद करण्यात यावी. कोणत्याही समाजाची ओळख चुकीची नोंदवली जाणार नाही किंवा दुर्लक्षित होणार नाही, यासाठी जनगणना अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, अशीही मागणी रवींद्र यादव, पांडुरंग भेले, दीपक वाघाडे यांनी निवेदनातून केली
२०२७ च्या जनगणनेत धर्म, पंथ आणि सामाजिक ओळखींची अचूक नोंद करण्याची मागणी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




