– महात्मा गांधी आणि बिरसा मुंडा यांच्या विचारांचा जागर; विद्यार्थ्यांचा गौरव
हंसराज,भंडारा लाखनी :- स्थानिक स्वर्गीय निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथे ९ ऑगस्ट रोजी ‘ऑगस्ट क्रांती दिन’ आणि ‘आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे कार्यवाह प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. योगेश करवाडे आणि डॉ. चंद्रशेखर देवघरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
क्रांती दिन आणि स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास: प्रमुख वक्ते डॉ. योगेश करवाडे यांनी ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला, ज्यामुळे ब्रिटिश राजवटीला सळो की पळो झाले होते. डॉ. चंद्रशेखर देवघरे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, १५० वर्षांच्या जुलमी राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी गांधीजींचे योगदान मोलाचे आहे. प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी अध्यक्षीय भाषणात मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर झालेल्या ऐतिहासिक घोषणेची आणि ‘करो या मरो’ या मंत्राची आठवण करून दिली.
आदिवासी संस्कृती आणि हक्कांचे रक्षण: आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त बोलताना डॉ. करवाडे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि आदिवासींच्या सामाजिक व शैक्षणिक समस्या मांडल्या. प्राचार्यांनी आदिवासी दिन साजरा करण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, आदिवासी समुदायाची संस्कृती, भाषा, जल-जंगल-जमीन यांचे संरक्षण करणे आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे.
विद्यार्थ्याचा गौरव: या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘रेड रिबन रन’ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी हंस पुरुषोत्तम भुते याला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समन्वयक डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. श्रद्धा बोरकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





