कामठी :- एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वावर वारंवार टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे सोपे असते; मात्र जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष, सातत्य आणि जनसेवा करावी लागते, अशी भावना रणाळा ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज साबळे यांनी व्यक्त केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघर्षातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या कार्यावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवणारे असंख्य कार्यकर्ते व सामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कितीही टीका अथवा आरोप झाले, तरी त्यांच्या कर्तृत्वाची उंची कमी होणार नाही, असे साबळे यांनी स्पष्ट केले.
“व्यक्तिमत्त्व हे टीकेने नाही, तर कर्तृत्वाने मोठे होते. टीका करणारे अनेक येतात आणि जातात; मात्र जनतेसाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व जनतेच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण करते,” असे पंकज साबळे यांनी सांगितले.
बावनकुळे यांनी केलेले विकासकाम, जनसामान्यांशी असलेला संपर्क आणि संघटनात्मक कार्य हेच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे. त्यामुळे “बावनकुळे यांचे कामच त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देईल. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असा विश्वासही सरपंच पंकज साबळे यांनी व्यक्त केला.





