-मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची आढावा बैठक; जलस्रोतांची पाहणी, महादेव घाटातून अतिरिक्त पाणी उपलब्धतेची चाचपणी
कामठी :- येरखेडा शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या गंभीर पाणीटंचाईच्या प्रश्नाची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी येरखेडा येथे दाखल झाले. त्यांनी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.
गेल्या काही काळापासून येरखेड्यातील विविध भागांत पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाढती लोकसंख्या, उपलब्ध जलस्रोतांवरील वाढता ताण आणि पाणी वितरणातील अडचणी लक्षात घेता या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली.
शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी
आढावा बैठकीनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी येरखेडा नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांसोबत शहरातील विविध भागांना भेटी दिल्या. कोणत्या परिसरात किती पाणी उपलब्ध होते, नागरिकांना किती वेळ पाणी मिळते, पाणी वितरणाची व्यवस्था कशी आहे तसेच भविष्यातील गरज भागविण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याची माहिती घेण्यात आली.
पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडथळे शोधून ते तातडीने दूर करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. येरखेडा शहराच्या वाढत्या विस्ताराचा विचार करून भविष्यातील पाण्याची गरजही लक्षात घेण्यात आली.
महादेव घाटातून अतिरिक्त पाण्याची शक्यता
दरम्यान, अधिकाऱ्यांनी महादेव घाट परिसराचीही पाहणी केली. नदीतून भविष्यात येरखेडा शहरासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देता येईल का, उपलब्ध जलस्रोताचा किती प्रभावी वापर करता येईल आणि त्यासाठी कोणत्या स्वरूपाची उपाययोजना आवश्यक आहे, याची प्राथमिक पाहणी करण्यात आली.
यामुळे येरखेड्याच्या पाणीप्रश्नावर केवळ तात्पुरत्या उपायांवर अवलंबून न राहता भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन कायमस्वरूपी जलव्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
‘नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये’
येरखेडा शहरातील कोणत्याही नागरिकाला आगामी काळात पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पाणीपुरवठ्यातील त्रुटी दूर करणे, उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करणे, यावर भर देण्यात आला.
बावनकुळे यांच्या निर्देशानंतर प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी सुरू केल्याने येरखेड्याचा पाणीप्रश्न मार्गी लागण्याच्या आशा नागरिकांमध्ये निर्माण झाल्या आहेत. आता या पाहणीनंतर प्रत्यक्ष उपाययोजनांना किती वेग येतो, याकडे येरखेडावासीयांचे लक्ष लागले आहे.
या पाहणीवेळी येरखेडा नगरपंचायतीचे अध्यक्ष राजकीरण बर्वे, मुख्याधिकारी गौरव झेंडे, विरेंद्र ढोके, सभापती मनीष कारेमोरे, नगरसेवक गजानन तिरपुडे, राजेश पिपरेवार, अंकित वाघ, मनीष भाटी यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, विभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.





