नागपूर :- शेतकऱ्यांना दिवसा आणि भरवशाचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर परिमंडळात सुरू असलेल्या विद्युत प्रणाली सक्षमीकरण व बळकटीकरणाच्या विविध विकासकामांची बीजिंगस्थित एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) च्या प्रतिनिधी मंडळाने नुकतीच पाहणी केली. एआयआयबीच्या अर्थसाहाय्यातून सुरू असलेल्या प्रकल्पांच्या या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान प्रतिनिधी मंडळाने महावितरणच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व दर्जेदार कामाबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी एआयआयबीच्या अर्थसाहाय्यातून नागपूर परिमंडळात नवीन विद्युत उपकेंद्रे उभारण्यात येत आहेत. यासोबतच अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवणे, उपकेंद्रांची क्षमता वाढवणे तसेच उपकेंद्रांच्या ऊर्जीकरणासाठी आवश्यक 33 केव्ही व 11 केव्ही वाहिन्या टाकण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व विकासकामांचा उच्च दर्जा, कामाची गती तसेच सुरक्षा व पर्यावरणाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यासाठी या उच्चस्तरीय मंडळाने हा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान मौदा विभागातील सेलू येथील सौर कृषी प्रकल्पाच्या कामाची प्रगती, तांत्रिक बाबी आणि सुरक्षा मानकाच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी सादर केली.
या पाहणी दौऱ्यात एआयआयबीच्या प्रतिनिधी मंडळात सहयोगी अधिकारी शुवम सरकार रॉय, वरिष्ठ पर्यावरणतज्ज्ञ इंद्राणी घोष, जलतज्ज्ञ स्मिता मिश्रा, सामाजिक तज्ज्ञ सू ट्रान क्वाय, पर्यावरण सल्लागार दमनजितसिंह मिन्हास आणि सल्लागार राजीव मिश्रा यांचा समावेश होता. त्यांच्या समवेत महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता संजय वाकडे, कार्यकारी अभियंता अजय कोलते यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दौऱ्यादरम्यान शिष्टमंडळाने कामठी तालुक्यातील शिवणी गावाचे रहिवासी मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचे लाभार्थी कोरडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीदरम्यान मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली; ज्यामध्ये अर्ज प्रक्रिया, लाभार्थी निवड, पंप बसवणे ते प्रत्यक्षात कार्यान्वित करणे या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्यात आली.. शिष्टमंडळाने या महत्त्वाकांक्षी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर झालेली सकारात्मक परिवर्तनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
या शिष्टमंडळाचे यजमानपद भूषवणे आणि सौर उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीतील उत्कृष्ट नेतृत्वासाठी मुख्य अभियंता राजेश नाईक यांचा शिष्टमंडळातील सदस्यांच्या हस्ते झालेला सन्मान नागपूर परिमंडळासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला. अधिक हरित भविष्यासाठी शाश्वत जलव्यवस्थापन आणि अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने महावितरणची ही वाटचाल अशीच यशस्वीपणे सुरू राहणार असल्याची माहिती राजेश नाईक यांनी यावेळि दिली.





